
गुणवरे :* प्रतिनिधी
कै. संजय गांधी विद्यालय, गुणवरे येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. *डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट, पुणेचे प्रमुख पाहुणे श्री. संकेत शहा* यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट, पुणेचे ट्रस्टी *अमित जंजानी* व *अखिल भंडारी* तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष रेश्माताई कणसे, उपाध्यक्ष बापूराव गावडे, गुणवरे संस्थेचे सचिव राहुल कणसे सर तसेच गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्या वनिताताई आढाव, पोलीस पाटील अमोल आढाव, पुणे पोलीस मनोज आढाव, हिरामण आढाव, पंचक्रोशीतील विविध मंडळे व संस्थांचे पदाधिकारीसंस्थेचे प्रशासन अधिकारी श्री गावडे सर
माजी मुख्याध्यापक श्री कुंभार सर, ग्रामस्थ, पत्रकार राजेंद्र बनसोडे, पत्रकार वैभव गावडे,पत्रकार शशिकांत आढाव, पत्रकार अमोल बागव, तसेच सांगळे सर, जाधव मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

ध्वजारोहणानंतर वंदे मातरम्, राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. संविधानाचे वाचन करण्यात आले. विद्यालयातील एनसीसी छात्रांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत मान्यवरांना सलामी दिली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरणही केले.
*‘अधिकाऱ्यांचे गाव’ म्हणून गुणवरेची ओळख*
कै. संजय गांधी विद्यालयाची स्थापना कै. वसंतराव कणसे बापू यांनी सन १९७९ मध्ये पंचक्रोशीतील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या शैक्षणिक संकुलातून आजवर १५० पेक्षा अधिक अधिकारी घडले असून त्यामुळे गुणवरे गावाची ओळख ‘अधिकाऱ्यांचे गाव’ अशी निर्माण झाली आहे.
कै. वसंतराव कणसे बापू यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव तथासंस्थेचे सचिव श्री राहुल कणसे, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे , हे संस्थेची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे,
त्यांच्या प्रयत्नांतून विद्यालयात विविध शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सध्या विद्यालयात सुमारे २६० ते २७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व तयारी करून घेतली जाते. एनएमएमएस परीक्षेत विद्यालयातील १० विद्यार्थी पात्र झाले आहेत. तसेच इयत्ता दहावीचा विद्यालयाचा निकाल ९४.२० टक्के लागला आहे.
दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गावडे सार्थक – ९५.४० टक्के, सई कुंभार – ९३.२० टक्के आणि समीक्षा आटोळे – ९२.६० टक्के गुण मिळवून केंद्रातील प्रथम तीन क्रमांक विद्यालयाने पटकावले. क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव ए. एस. यांनी प्रास्ताविकातून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला. सकाळचे अतिरिक्त तास, एनएमएमएस, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, मंथन, चित्रकला स्पर्धा, क्रीडा महोत्सव आदी विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. तन्वी गावडे व कु. निकिता आढाव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी श्री. कदम सर यांनी, “सर्वांचे आभार मानण्यापेक्षा सर्वांच्या ऋणात राहणे पसंत करेन,” अशी भावना व्यक्त केली. यावेळी डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमातून गुणवरेच्या शैक्षणिक परंपरेचा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि विद्यालयाच्या प्रगतीचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. शाळेतर्फे डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे श्री. अरुण शहा व श्री. उपेन छाजेड यांचे विद्यार्थ्यांना स्टेशनरी व उपयुक्त साहित्य दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले
